Tuesday, June 14, 2022

 



वसंत राशिनकर 

( १२ जुलै १९३० - ७ जानेवारी २०१५) 


 कोण होते वसंतराव राशिनकर ? ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून  एक सर्वसाधारण माहिती अशी सांगता येईल की वसंतराव राशिनकर यांचा जन्म १२ जुलै १९३० रोजी उज्जैन येथे झाला आणि ७ जानेवारी २०१५ला  इंदौर येथे निधन झाले, पण वसंतराव राशिनकर  साधारण माणूस  नव्हते हे त्यांची ८५ वर्षांची कारकीर्द पाहिल्या नंतर सहजच लक्षात येते.खरं तर जो माणूस जन्माला येतो तो त्याला मिळालेलं  आयुष्य आपल्या परीने जगतोच, पण महत्वाचं असतं ते हे की तो कसा जगला. 


एका सामान्य माणसाच्या आयुष्याचा एक मोठा भाग 'रोजी-रोटी' साठी वणवण फिरण्यात खर्ची पडतो.तो काळ त्यांचाही तसाच गेला, पण त्या दरम्यान सुद्धा त्यांची कलेची उपासना, साहित्याची आराधना चालूच राहिली. एकीकडे काबाडकष्ट करून  ते आपल्या मुलांना घडवीत होते, तर दुसरीकडे हात  रंगवून मातीच्या गोळ्यांना आकार देत होते.जमिनीवर पाय असलेल्या ह्या माणसाची नजर आकाशाकडे असायची पण हात मातीत गुंतलेले असायचे आणि जेंव्हा ते  पाण्याने स्वच्छ व्हायचे, तेंव्हा ह्या  हातांमध्ये लेखणी असायची. सच्च्या दिलाचा हा माणूस खऱ्या अर्थाने शारदोपासक होता आणि आपल्या परिसरात 'वसंत' फुलवीत होता.


 वसंतराव राशिनकर, फक्त माझ्यासारख्या त्यांच्याहून सर्वच बाबतीत  लहान असलेल्यांसाठीच ''अप्पा'' नव्हते, तर त्यांचे समवयस्क, समकालीन अशा सर्वच मंडळींचे ते अत्यंत प्रिय आणि लाडके होते. सहसा असे दृश्य दिसत नाही. एखादी व्यक्ती जेंव्हा जनप्रिय असते, तेंव्हा समकालीन व्यक्तींच्या पोटात नेमका शूळ उत्पन्न होतो. अप्पांशी बोलताना कधीही हे जाणवायचं नाही की त्यांनी मराठी,हिंदी,इंग्रजी अशा एकूण तीन भाषांमध्ये एम.ए.ची डिग्री मिळविली आहे. अत्यंत निगर्वी वृत्ती. म्हणतात न ज्या झाडाला जास्त फळ असतात, ते झाड वाकलेलं असतं.अप्पा त्याचे प्रत्यक्ष उदाहरण होते. 


तीन विषयात प्राविण्य मिळविणं कमी वाटलं म्हणून त्यांनी एम.एड केलं, साहित्यालंकार ही उपाधी मिळवली आणि एव्हढ्यावरच ते थांबले नाही तर ज्योतिष शिकले,वायरलेस इंजिनियरचा कोर्स केला,रेडिओ टेक्निशिअनचा डिप्लोमा घेतला. ज्ञानार्जनाची  एक अदम्य लालसा त्यांच्यात होती. नंतर ते खेळांकडे वळले.पोहायला शिकले, बैडमिंटन  शिकले,टेबल टेनिस मध्ये प्राविण्य मिळविले  आणि बुद्धिबळात चेम्पियनशिप पटकावली.इतकंच नाही तर ट्रक आणि बस चालविणं सुद्धा ते शिकले होते.हे सर्व करत असतानाच स्वकष्टाने साधारण शिक्षक ते व्याख्याता एव्हढा मोठा पल्ला गाठला, पण एकदाही कधी त्याचा उच्चार केल्याचे आठवत नाही. अप्पांचे वडील, ज्यांना आम्ही भैयासाहेब म्हणत असू, पोलिस अधिकारी होते, तरी घरात कडक शिस्तीचे नव्हे तर प्रेमाचे   वातावरण होते. आजीच्या प्रेमळ सहवासात वसंतरावांचे रोप फुलले आणि नकळत कविता फुटली,उमलली, बहरली. 


सन १९४८ मध्ये इंदौरच्या महाराष्ट्र साहित्य सभेच्या शारदोत्सवात अध्यक्ष म्हणून लब्ध प्रतिष्ठित साहित्यिक वि.स. खांडेकर होते. त्यांना मांडव बघायला जायचे होते.त्याच दरम्यान धारच्या आनंद कॉलेज मध्ये त्यांचे व्याख्यान आणि सोबत स्थानिक साहित्यिकांचे कवी संमेलन करायचे ठरले. अप्पांचे वडील,भैयासाहेब तेंव्हा धारलाच पोलिस अधिकारी होते. उत्सव समितीचे सचिव, ज्येष्ठ कवी अनंत पोतदार त्यांना भेटायला गेले, तेंव्हा अप्पांनी पोतदारांना आपल्या कविता दाखविल्या.त्यांना त्या खूप आवडल्या व ते कवितांची वही खांडेकरांना दाखवायला घेऊन गेले.कविता वाचून खांडेकर म्हणाले-- ह्या मुलालाही कवी संमेलनात कविता सादर करायला बोलवा. अठरा वर्षाच्या एका कोवळ्या वयाच्या तरुणाला खांडेकरासारख्या दिग्गज साहित्यिकाची जी थाप पाठीवर मिळाली,ती एक प्रकारे वरदानच ठरली आणि हळू हळू अप्पांच्या कवितेचा वेलू गगनावरी पोहचला. ह्या वेलीवर नंतर तीन कविता संग्रह आणि एक सीडी अशी फुलं बहरली.अप्पा आपल्या हास्य आणि विनोदी कवितांमुळे लोकप्रिय होते.त्यांच्या या कवितांमध्ये उपरोध सुद्धा जाणवायचा,पण त्यांचे काव्य संग्रह  वाचताना हे सहजच लक्षात येतं की अशा हल्क्या-फुल्क्या कवितांपेक्षा जास्त कविता त्यांनी वैचारिक आणि भावनिक ताकदीच्या लिहिल्या आहेत. 


राजेंद्रनगर, इंदौर येथील राशिनकरांच्या घरात प्रवेश करावा तर गेल्या गेल्या समोरच भव्य अशी साईबाबाची  मूर्ती दिसते आणि मग जागोजागी,खाली वर सगळीकडे अप्पांच्या हातांची करामात पाह्यला मिळते .सुरवातीला ते मातीच्या मूर्ती बनवत असत ,नंतर त्यांनी प्लास्टर ऑफ पेरिस आणि लाकडाच्या मूर्ती देखील बनविल्या.शिवाजी महाराज,देवी अहल्या, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी,इंदिरा गांधी, गजानन महाराज यांच्या एका पेक्षा एक सुरेख प्रतिमा त्यांनी घडविल्या.खरं तर कविता आणि मूर्तीकला ह्यांच्या आधारानं त्यांना  नोकरी  नंतरच  आयुष्य सहज काढता  आलं असतं. ह्या भरभक्कम संपत्तीच्या बळावर अप्पांना निर्वेध जगता आलं असतं पण असं शांत जगले असते तर ते 'जगत अप्पा' झाले नसते.


सन १९८९ मध्ये सेवानिवृत्ती नंतर ते इंदौरला आले आणि राजेंद्रनगर ही त्यांनी आपली कर्मभूमी निश्चित करून ''आपले वाचनालय'' सारखी एक अप्रतिम संस्था स्थापित केली.४ मार्च १९८९ रोजी  कुटुंबियांच्या मदतीने सुरु झालेलं ''आपले वाचनालय'' हळू हळू ३०० सदस्यांच्या आकड्या पर्यंत पोहचलं  आणि पाहता पाहता पुस्तकांची संख्या ५०००च्या वर गेली.ह्या पुस्तक खरेदीसाठी त्यांनी स्वत:ची पदरमोड करून हजारो रुपये खर्च केले, पण वाचनालयातून होणारी प्राप्ती मात्र निराश्रित वृद्धांसाठी खर्च केली.संस्थेच्या नावात जरी वाचनालय असलं तरी, ही संस्था नुसते वाचनालय कधीच राहिली नाही.''आपले वाचनालय''  म्हणजे जणू अप्पांच्या व्यक्तिमत्वाची प्रती:छाया. अप्पांच्या व्यक्तिमत्वाचे  जसे  अनेक पैलू होते तसेच ह्या संस्थेचे देखील त्यांनी अनेक पैलू पाडले.बाल नाट्य शिबीर, एकांकिका स्पर्धा, कवी सम्मेलन,व्याख्यानं, इतकंच नाही तर बृहन महाराष्ट्र मंडळाचे परीक्षा केंद्र सुद्धा इथे स्थापित झाले.  ''आपले वाचनालय'' काय आणि किती अंगांनी बहरलं होतं.आपले वाचनालयाला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळायला लागला तेंव्हा अप्पांनी त्याचे स्वरूप अजून वाढीस नेले.''आपले वाचनालय साहित्य एवं संस्कृती केंद्र'' असे नाव देऊन त्याचा परीघ वाढवला.१९९३ साली तेथे संगीत साधना केंद्राची स्थापना केली आणि पुढे दरवर्षी अनेक विषय घेऊन ग्रीष्मकालीन शिबिरं भरविली.या शिबिरांमध्ये संगीत,चित्रकला,योगासनं, कराटे बरोबरच संस्कार शिबीर पण भरवले जायचे.


गाठीशी गडगंज पैसा असला तरी दात कोरणारे अनेक लोक आपण आपल्या आजू बाजूला  बघतो, पण अप्पांनी आपल्या आयुष्यभराची कमाई म्हणजे भविष्य निर्वाह निधी खर्च करून घराच्या गच्चीवर सर्व सोयींनी युक्त असा एक हॉल बांधला आणि इतकंच नाही तर  तेथेच एक खोली पण बांधली, जेणे करून बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना तेथेच थांबता यावे.घराच्या गच्चीवर बांधलेला हॉल असा कितीसा मोठा असणार ? पण १९९६ मध्ये जेंव्हा अप्पांनी याच हॉल मध्ये एकांकिका स्पर्धा करायचे ठरवले तेंव्हा तब्बल ८० एकांकिका तेथे सादर झाल्या.अप्पांची हाक ही अशीच  असायची.अगदी मनापासून,तळमळीने दिलेली हाक.हा सर्व खटाटोप करण्या मागे त्यांची एकच भावना होती की ज्या समाजाकडून आपण अनेक गोष्टी शिकतो, त्या समाजाच्या उत्कर्ष आणि उन्मेषासाठी आपण झटायला पाहिजे.समाजाचे ऋण फेडायला पाहिजे.त्यांनी आयुष्यभर मराठी भाषा,संस्कृती आणि बाणा जपण्यासाठी अविरत श्रम घेतले.


एकूण साहित्यिक प्रवास :  

वसंत ,अमृत, श्रीयुत,गावकरी, वाङ्ग्मयशोभा , बहुश्रुत, स्त्री,श्री सर्वोत्तम इत्यादि वर्तमान नियतकालिकातून , पत्र व काव्य , स्फूटलेख ह्यांची नियमित प्रसिद्धि . अनेक हिन्दी कवितांचे अ . भा . हिन्दी काव्य संग्रहात प्रकाशन . 

 काव्य संग्रह : वेदना ( 1975 ) , परिध ( 1990 ) आणि तेंव्हा सूर्य पण लाल होता ( 2005 )


पुरस्कार / सम्मान :


बृ . म . मंडळ नवी दिल्ली तर्फे दिल्ली येथे विशिष्ठ गुणीजन सन्मान  

मुंबई मराठी संग्रहालया द्वारे देण्यात येणारा प्रतिष्ठित गाडगीळ पुरस्कार 

 मुंबई येथिल सिरॉक इंडिया नेशनल अवार्ड चे मानकरी  

आपले वाचनालय ( साहित्य , कला , संस्कृति केन्द्र ) ह्या संस्थेला जयपुर येथे बृहन्महाराष्ट्रातिल सर्वोत्कृष्ठ संस्थेचा मान व पुरस्कार 

 पूर्व केन्द्रिय मंत्री आणि सांसद मा . सुमित्रा महाजन यांच्या हस्ते  जीवन गौरव पुरस्कार ' संस्कृति सेवा अमृत सम्मान ' प्रदत्त 

ह्या व्यतिरिक्त अनेक मान्यवर संस्थांद्वारे वेळोवेळी कला , साहित्य , संस्कृति आणि मराठी संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला गेला.


१. मी चारभिंतींच्या आत दडवून कितीही झाकून ठेवलं लपवून ठेवलं दु:खाला, यातनेला तरी पण एके दिवशी तयार झाला गौतम त्यागून सर्व मायेला - मोहाला देऊन मंत्र जगाला बुद्धं शरणं गच्छामि धम्मम् शरणं गच्छामि आणि हे सर्व असून माहीत मला तुम्हाला , जगाला तरी आहोत बाळगून भ्रम आम्ही की जगाचा भार घेणारा मीच तो शेषाद्री आहे . २ . झोप जगाला झोपविणारी झोप स्वतः मात्र असते जागत स्वप्नाचे दर्शन होऊ नये म्हणून नि स्वप्न असते पहात वाट झोपेची पाहण्याकरितां स्वप्न अन् मनुष्य असतो घेत गोळ्या झोपेच्या सगळंच विसरायला नि गुलाबी स्वप्न गोंजारायला . ३. खोटा पैसा बारा घरच्या बारा चुली तरी अष्टग्रही उतु लागली चारा करीता एकच डब्बा एका साठी चारांचा खांदा भिंतीचे मग कानामधुनी सीत्कारांचे वारे गेले नव आशेच्या तॄणांकुराला गोंडस नवीन कोंब फुटले व्यवहाराच्या ' किलोग्रॉम ' चे जुने तराजू हाती लागले , पिवळी साड़ी हिरवी चोळी आट्या विना बनली पोळी गडी गडे गड्यांची गडबड जगण्याची उगाच बडबड . दारू बंदीची उगाच धडपड हारांनी होई मान बोजड . ४. एक क्षण दोन कणाच्या दाण्यासाठी दोन मणाचे ओझे पाठी दोन जीवाच्या लग्नासाठी दोन हजार जमती वराती एक क्षणाच्या सुखासाठी एक लक्ष दु:खे पाठी एक जगाला नष्ट कराया एक अणुची पुरते माया शुन्य जगाच्या शुन्यापोटी शुन्यामध्ये फीरती तरंगती शुन्यालयांत शुन्य पुजूनी शुन्यच उरले शुन्या हाती . ५. वेड हे पण वेड असते वेडाचे हे असेच असते चंद्रावर ते स्वारी करते अन् हृदयाचे रोप लावते . वेडे नसते तर शहाणे कुठले वेड नसले तर पेडगांव कसचे ? वेडाचे पण प्रकार आहेत तिथि आहेत नक्षत्र आहेत . रंगाला पण वेडच असते रूपाचे वेड जगच बुडवते पितळ सोन्याला किंमत देते वेड शहाण्यांना वेडावते म्हणूनच न्यूटनला जग मान देते . वेडाला पण जन्म असतो कल्पनेच्या अनंत विश्वांत आत्महत्येचे अपयश गुन्हा ठरतो कल्पनेचे अपयश वेडा बनवतो . वाढलेले रोप खुरडता येते वाढलेले वेड सरणातच जळते वेडामुळेच जगाचा विकास आहे वेडे जर नसते तर जगच निराळे झाले असते. ६. भयानक संस्कृतीच्या नावाखाली पंरपरेच्या हातातलं बनून बाहुलं टाकलं जेंव्हा मानवाने आपल्याच पोटच्या गोळ्याला वाळीत विधवा म्हणून तेंव्हापासूनच कुंकवाला आलं पांढरपण पांढऱ्या कोडापेक्षाही भयानक . ७. स्वप्न निर्ढावलेल्या दिवसाची सुरवातच होते मुळी आळसावलेल्या जांभईतून अन् रजनीच्या बाहुपाशांत बर्फाळलेले स्वप्न पाणी पाणी होते दिसाच्या सोनेरी किरणांनी . ८. गरमी वाऱ्याला होऊ लागली गरमी जेंव्हा तेंव्हा त्याने घेतली ओढून चादर चांदण्याची चंद्राला लपवून हृदयाशी . ९. राख चुलीत टाकलेली राख नोकर एकवेळ काढील पण मालकाने डोक्यांत घातलेली राख तो कशी काढणार ? १०. विडंबना रात्रीचा करुन दिवस घामाच्या पाण्याने छिन्नीला भिजवत कोरले दगडाला त्याने छातीवर परमेश्वराच्या ठेवून पाय परमेश्वरालाच केले निर्माण मंदीरात झाले आगमन मूर्तीचे मूर्तिकाराला ठेवून बाहेर अस्पृश्य म्हणून . ११. चांदीचा चमचा चांदीचा चमचा तोंडात ठेऊन जन्माला आलेला जाताना मात्र तोंडात दातही ठेवून जायला तयार नसतो . १२. नेपोलियन अज्ञानाच्या आनंदातंच राहिला आहे मनुष्य जिवंत आजपर्यंत भविष्याच्या सुखद नि गोंडस कल्पनेच्या कुशीत लपवत स्वतःला अन स्वप्नाला ! नाहीतर नश्वरतेच्या या जगात शाश्वत साम्राज्य वाढविण्याचा अट्टाहास नेपोलियनने कधीच केला नसता. १३. गुरू तुम्हाला जर हवं असेल खरं खरं सुख तर कोंडयाचा मांडा करायला , दगडापेक्षा वीट मऊ म्हणायला शिका अन् अन्न , वस्त्र , निवारा नसणाऱ्याला करा गुरु अन् घेत पाठ दुःखाचे मिळवायला शिका सुखाचा साठा . १४. विस्मृती विस्मृतीच्या आवरणात काय नाही मी ठेवले जमवून,आवरून केव्हां तरी एखाद वेळेस येईल कामाला म्हणून आणि आली वेळ जेंव्हा कामाला येणाऱ्या वस्तूची घ्यायची उपयोगाला तेंव्हा तेंव्हा कळले मला की सर्वच अशाश्वत अनिश्चित - असंगत ठेवलं होतं आवरून कारण शेवटी गेलो मीच विस्मृतीत स्मृतीच्या वस्तूंना मागे ठेवून. १५. खरा कवी बायकोकरीता बायकोची फरक फक्त इतकाच की नवऱ्याने केलेली ही कविता त्याच्या बायकोची ' केल्याने होत आहे रे ' लिहा लिहा गडे करून सुचविला विषय स्वतःचा लिहिता नाक नकटे तिचे आणि दात भोपळ्याचे , फणकारून म्हटले तिने ' हे काय वर्णन माझे ' ? कल्पनाच करायची तर खरी काय खोटी काय लिहा मजेदार गडे नाक माझे चाफेकळीचे . बायका असतात सुंदर किती बोटावर मोजण्या एवढया तरी मग कविकल्पना कशाची ? बुद्धिची ती कमाल कशाची ? केलं मी मग असे वर्णन तिचे पद्मीनी पडली चाट त्याने म्हणते कशी ती मग मला आहात बुवा खरे कवी तुम्ही ! १६. तेव्हां सूर्य पण लाल होता ! तेव्हां सूर्य पण लाल होता ! फार पूर्वीचा काळ होता . तेव्हां चंदाचे चांदणे ' गरम ' होते सूर्याचा दाह शीतल होता दुधाचे रक्त बनत होते रक्ताचे पाणी बनत होते आमच्यात पण पाणी होते तेव्हां सूर्य पण लाल होता ! फार पूर्वीचा काळ होता . तेव्हां शरीरात सुस्ती होती , मनात मात्र अति मस्ती होती , बदामाचा शिरा पचत होता तरी अंगातला रग जिरत नव्हता ! जिभेला स्वर हरवत होते शब्दांचे रूप विरत होते आकाशाचा आकार छोटा होता घराचा परीघ मात्र मोठा होता तेव्हां सूर्य पण लाल होता! आकाश पण लाल होते तिचे गाल पण लाल होते माझे जग मात्र गोल होते गोलात जगाचा जन्म होता कानांत माझ्या प्राण होता पायांत मात्र त्राण नव्हता तेव्हां सूर्य पण लाल होता फार पूर्वीचा काळ होता . १७. अमरत्व अमरत्वाच्या वेड्या स्वप्नात कितींनी उपास तापास केले उभे राहिले एका पायावर नि डोके जमिनीत गाडून अमरवेलाचा शोध करीत फिरले दऱ्या खोऱ्यात जंगलात,खाचा खळग्यात. स्वर्गाची वाट शोधण्यात. यंत्रांनी, मंत्रांनी, अनुष्ठानांनी घालीत आहे गोंधळ अजूनपावेतो. केंव्हा कळेल कोणास ठाऊक मरणच तर माणसाला अमर करत असते जीवनभर.

संकलन : अलकनंदा साने


 


    सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव             (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)                   सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...