Monday, January 22, 2024

रा. अ. काळेले

 रा. अ. काळेले
(२२ फेब्रुवारी १९०७- १२ जून १९८१)



रामचंद्र अनंत काळेले यांचा जन्म सेंधवा, जिल्हा खरगोन (म. प्र.) या गावी झाला. त्यांनी  बी.ए., एल्एल.बी., संस्कृत काव्यतीर्थ ह्या पदव्या मिळवून पोलीस अभियोजक (प्रॉसिक्यूटर) म्हणून नोकरी केली.  मूळ गाव जुन्नर परंतु नोकरीनिमित्त इंदूरला स्थायिक झाले. शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि चारित्र्यसंपन्न म्हणून नोकरीत त्यांचा दबदबा होता. ते  पोलिस खात्यात अधिकारी होते पण त्यांनी त्या रुक्ष खात्यात राहूनही आपले कविमन जपले होते. काळेले यांचे सारे आयुष्य मध्य प्रदेशात इंदौर येथे गेले.

काळेले यांच्या बाबतीत एक विशेष नोंद म्हणजे पुढे मराठी कवितेच्या प्रांतात नाव मिळविलेल्या या कवीला बालपणी नीट मराठी बोलताही येत नव्हते. वडिलांमुळे त्यांच्यावर इंग्रजीचाच प्रभाव होता. पुढे मात्र त्यांनी मराठी व संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले. या भाषांवर अधिराज्य गाजवत त्यांनी इतकी उंची गाठली की इंदौर येथील त्या वेळचे राज्यकर्ते होळकर यांनी 'राजकवी' ह्या उपाधीने त्यांचा गौरव केला. 

रा. अ. काळेले हे नवकवींच्या मागच्या पिढीतले असूनही त्यांनी नवकवितेचे स्वागत केले व हे वळण आत्मसातही केले. त्यांची सुरुवातीची कविता गेय होती. त्यांना अतिशय देखणे व्यक्तिमत्त्व लाभले होते. ते उत्तम काव्यगायन सादर करीत. अनेक कविसंमेलनांतून त्यांनी काव्यगायन केले. त्यांची उत्तरकालीन कविता मुक्तछंदात्मक होती. त्यांत दलितोद्धाराची तळमळ दिसते. संस्कृत भाषेचे आणि काव्याचे विलक्षण प्रेम होते. त्यातूनच ‘विक्रमोर्वशीय’ या संस्कृत काव्याचे मराठीत रूपांतर केले. म.ना. अदवंत यांच्या मतानुसार कुसुमाग्रज, वा.रा.कांत, बा.भ.बोरकर, श्रीकृष्ण पोवळे आणि रा.अ.काळेले हे पाच कवी म्हणजे आधुनिक कविपंचक आहे. अरे अरे कळसा ही कविता 'बालभारती'त होती ही एक आणखी महत्त्वाची माहिती यूट्यूब वाहिनीमुळे मिळाली.

रा. अ. काळेले यांचे उत्तमोत्तम असे ७ कवितासंग्रह वाग्वसंत, ओळखीचे सूर, भावपूर्णा, वसंतागम, गीतनिर्वाण, हिमअंगार, रूपमती तसेच ' भा.रा.तांबे : एक अध्ययन ' 'नवकवितेचे एक तप -१९४५ ते ५७' आणि "नवे अलंकार' हे समीक्षा ग्रंथही प्रसिद्ध आहेत. हे सर्व ग्रंथ १९३४ ते १९६४ या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत त्यांच्या अधिकांश ग्रंथांचे प्रकाशक कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे आहेत.  
त्यांची उत्तरकालीन कविता मुक्तछंदात्मक होती. त्यात दलितोद्धाराची तळमळ दिसते. संस्कृत भाषा आणि काव्य यावर विलक्षण प्रेम होते. त्यातूनच ‘विक्रमोर्वशीय’ या संस्कृत काव्याचे मराठीत रूपांतर केले.
रा. अ. काळेले यांच्या 'वाग्वसंत’ (१९३४), ‘भावपूर्णा’ (१९४३), ‘ओळखीचे सूर’ (१९४१) या सुरुवातीच्या कविता संग्रहांतील कवितांवर भा.रा.तांबे आणि रविकिरण मंडळातील कवींचा प्रभाव स्पष्ट दिसतो. ‘वाग्वसंत’ या काव्य संग्रहातील मोठा भाग हा प्रणय, शृंगार, प्रेमविषयक कविता यांचा आहे. या संग्रहाला कविवर्य भा.रा. तांबे यांची प्रस्तावना लाभली आहे. ‘रूपवती’ आणि महात्मा गांधींवरील ‘गीत निर्वाण’ ही त्यांची काव्ये प्रसिद्ध आहेत. ‘हिमअंगार’ आणि ‘नवे अलंकार’ ही पुस्तकेही वाचकप्रिय ठरली. ‘तांबे एक अध्ययन’ हा भा.रा.तांबे यांच्या कवितेचे मूल्यमापन करणारा त्यांचा समीक्षात्मक ग्रंथ महत्त्वाचा आहे. तांब्यांच्या कवितेचा सखोल अभ्यास करून त्यांनी या काव्य संग्रहातील कविता सौंदर्यपूर्ण प्रतिमांच्या भाषेत मांडल्या. 

त्यांच्या हयातीत ते विशेष प्रसिद्धीला आले नव्हते. प्रसिद्धिपराङ्मुख स्वभाव हेच त्याचे कारण असणार. पण भवानीशंकर पंडित यांनी याविषयी वेगळे मत नोंदविलेले आहे. 
पंडित म्हणतात, "रा. अ. काळेले आणि वा. रा. कांत” हे दोघे कवी पुण्या-मुंबईच्या परिसरापासून दूर असल्यामुळे व स्वभावाने चळवळे नसल्यामुळे त्यांच्या कवितांचा गाजावाजा जरा उशिरा झाला. काहीही असो. काळेले यांचे सात कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले असूनही महाराष्ट्रीय जनतेला ते फारसे परिचित नव्हते, हे खरे. हे दुर्दैव काळेले यांचे नव्हे, तर महाराष्ट्रातील काव्यरसिकांचे.
"सांग ना ताई, अशी गेली कुठे तरी आई? ' ही काळेले यांची इथे दिलेली कविता स्वतःच खूप बोलकी आहे. त्यावर वेगळे काही सांगायची आवश्यकता आहे, असे वाटत नाही. पण तरीही...! - दोन बहिणींची आई वारलेली आहे. धाकटीच्या अद्याप हे आकलनाबाहेरचे आहे. थोरलीला (पण तीही तशी वयाने छोटीच) धाकटी विचारत आहे, "आई कुठे गेली? ' शेवटी समर्पक असे काहीच सांगता न आल्याने थोरली तिला स्पर्शाच्या भाषेत उत्तर देते. छातीशी कवटाळते आणि तीही धाई धाई रडू लागते.
रा. अ. काळेले यांचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे चित्रकलेची आवड आणि उत्तमोत्तम चित्रांचा संग्रह.चित्रकार होण्याचे त्यांचे स्वप्न होते. मित्रमंडळींनी त्यांची चित्रे फ्रेम करून आपापल्या घरात जपली. काही ब्रिटीश मित्रांनी ती परदेशीही नेली. पुठ्ठ्याची घरे बनविण्याचाही छंद त्यांनी जपला. देखण्या घरांच्या प्रतिकृती बनवण्यातला आगळा आनंद त्यांना मिळत असे. 

सुट्टीच्या दिवशी गावाबाहेर जाऊन जलरंगात निसर्गचित्रे रंगविण्याचा छंद आयुष्यभर जोपासला आणि तो छंद कवितेतही दिसून येतो.  निसर्गावर कविता लिहिताना ते त्याचे निर्जीव वर्णन करीत नाहीत. त्यात ते बाहेरील आपला निसर्ग व आतील आपला आनंदभाव यांच्यात सीमारेषा ठेवत नाहीत.
रा. अ. काळेले यांनी कवितेबरोबरच काव्यसमीक्षाही लिहिली. साहित्यप्रेमाचा वारसा त्यांना वडील अ. सी. काळेले यांच्याकडून मिळाला. काळेले यांचा कल संस्कृत वाङ्मयाच्या अध्ययनाकडे अधिक होता. काव्यतीर्थ ही त्या क्षेत्रातील पदवीही त्यांनी मिळविली होती. काळेले यांचे महत्त्वाचे समीक्षाग्रंथ म्हणजे  "नवे अलंकार', "तांबे : एक अध्ययन' (भा. रा. तांबे यांच्या कवितांवरील), "नवकवितेचे एक तप : १९४५ ते १९५७' हे आहेत. 
समीक्षा लिहिल्यात तरी आतले अस्सल  कवीमन जीवंत राहिले. दलित किंवा खालच्या वर्गातील कष्टकरीचें श्रम बघून  त्यांना मनस्वी त्रास होत असे.

काळेले यांच्या कवितेने खऱ्या अर्थाने कूस बदलली ती १९४५ नंतर. त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये सांगायची तर प्रयोगशीलता, गेयता, प्रासादिकता. संस्कृत अभिजात काव्याचा त्यांचा मोठाच व्यासंग असल्याने साहजिकच विविध वैशिष्ट्यांनी त्यांची कविता नटलेली आढळते. काळेले यांनी वेगवेगळ्या प्रतिमांचा वापर १९४५ नंतरच आपल्या कवितांमधून मोठ्या प्रमाणावर सुरू केला. "रूपमती' आणि "हिमअंगार' या काव्यसंग्रहांत त्याची प्रचीती येते.
रा. अ. काळेले यांना जशी माणसाबद्दल आपुलकी होती तशीच किंबहुना थोडी अधिक प्राण्यांविषयी होती.१९५४ साली म्हैसूरच्या  चामराजेंद्र बागेतील प्राणी संग्रहालयासाठी पकडून ठेवलेल्या एका सर्पाने स्वतःच्या मुक्ततेसाठी अन्नत्याग आरंभल्याचे वर्तमान प्रसिद्ध झालें होतें. इतर कोणत्याही प्राण्यापेक्षां सर्प हा वश होऊन राहण्यास अधिक नाखुषी दाखवितो असें तज्ञांचे मत आहे.त्या प्रसंगावरही त्यांनी अतिशय हृदयस्पर्शी कविता लिहिली .
काळेले यांनी काही छोट्या कविता लिहिल्या आहेत.ते त्यांना ''मुक्ता'' म्हणतात आणि आजकाल बहुतेक कणिका म्हटले जाते. 

नागपूरच्या डॉ. आशा सावदेकर यांना कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितांवर संशोधन करण्यासाठी युजीसी फेलोशिप मिळाली होती. तांब्यांवर आधिकारिक समीक्षाग्रंथ लिहिणाऱ्या काळेल्यांना भेटण्यासाठी त्या गेल्या असता त्यांना मिळालेला अनुभव एका लेखात असा व्यक्त केला आहे :
" युजीसीकडे सादर करण्यासाठी त्या त्या गावी गेल्याचे सर्टिफिकेट लेखकांडून घ्यावे लागे .इंदोरला रा. अ. काळेले यांच्याकडे गेले तेव्हा आम्ही सामान धर्मशाळेत ठेवले होते आणि कडेवर पाच महिन्यांची मुलगी होती. काळेल्यांनी दार उघडले, खूप वेळ ते माझ्या चेहर्‍याकडे पाहात राहिले,मग जेव्हा त्यांच्या पत्नी प्रतिभाताई म्हणाल्या की, ‘त्यांना आत तर येऊ द्या’ तेव्हा ते भानावर आले. मला म्हणाले, ‘‘मला माफ करा. माझी निवर्तलेली मुलगीच तुमच्यात मी पाहिली.’’आत येताच ते सावदेकरांना म्हणाले, ‘‘तुमच्याजवळ सामान कसे नाही?’’ आम्ही त्यांना धर्मशाळेचे नाव सांगितले तेव्हा त्यांनी ऑटोवाल्याला हाक मारून ‘‘तिथे जा आणि सामान आणा’’ असे माझ्या नवर्‍याला सांगितले. माझ्या मुलीला कडेवर घेऊन सगळे घर दाखवत ते म्हणाले, ‘‘आमचे घर मोठे आहे. फक्त माझ्या मुलीची मुलगी इथे आहे.’’ त्या घराने मला माहेरच दिले. त्यांनी मला खूप माहिती दिली.दोन दिवसांचा मुक्काम करायला लावला. उज्जैन, देवास इथले पत्ते देऊन कुणाकुणाच्या भेटी घ्यायच्या ते सांगितले. परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा माहेरवाशिणीसारखे हातावर दहीही घातले."

अशा ह्या सर्वार्थाने राजसी कवीचा दुर्दैवाने एकही काव्य संग्रह हाती लागला नाही.तसेच त्यांचे छायाचित्रही उपलब्ध नाही. 


 १. आई कुठे गेली? 


“ सांग ना ताई, अशी गेली कुठे तरी आई? ।

काल तिला तर उठवत नव्हते ।

म्हणती ती खिळली शेजेतें ।

आज सकाळी उठुनी पाहते । गेली तो आई ।

सांग ना ताई! ।।१।।


तू नि मीच ना इथली सारी ।

खिडक्या-दारे नीट लावली ।

वाट कशी मग तिला मिळाली ।

जावी कशी बाई ।

सांग ना ताई! ।।२।।


आजकाल मी हट्ट न केला ।

रडले नाही ठाउक तुजला ।

तिने बरोबर मग का मजला ।

घेतले नाही ।

सांग ना ताई ।।३।।


आई कुठे गेली असताना ।

उगी करावी तूच मला ना ।

आईसाठी तूच मग पुन्हा ।

रडसी कां ही?

सांग ना ताई ।।४।।


बाहुली माझी तूच फोडिली ।

चिमणी माझी तूंच हरविली ।

अगे लबाडे तूच लपविली ।

कुठे तरी आई ।

सांग ना ताई ।।५।।


बरें बरें जरी खाऊ न दिला ।

घेइ ताई जरी गोड गोडुला ।

पापा माझ्या दोन्हीकडला ।

दावी परी आई ।

सांग ना ताई ।।६।।


कवटाळुनी छकुलीला पोटीं ।

किती शहाणी ताई मोठी ।

होउनी छकुली वेडी धाकटी

रडली धाई ।। ७।।




२. नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 



नमस्ते प्रशस्ते कृपा तूं करी !

तुझ्या पुण्यवाणीत झाला खुला

अगे भक्तिसोपान सोपा भला

दुजा वेद तूं ! धन्य तूं वैखरी !

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 


प्रतापी तुझ्या मंत्रतेजोबलें

मराठी स्वराज्या असे स्थापिलें

अशी धन्य तूं वीरधात्री खरी !

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 


तुझी माधुरी मोदमात्रावहा

फुलांनी, मुलांनी खुले गे अहा !

कसें प्रेम साठे तुझ्या अंतरी !

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 


तुका-ज्ञानबा-दास-मोरेश्वरा

नमो कृष्ण-रामा नमो भास्करा

तुझे लाडके हे धरावे शिरीं

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 



३. अरे अरे कळसा ! 


अरे अरे कळसा 

हसून नको पाहू 

पायरीचा मी दगड 

तुझाच की भाऊ 


मी तर बडा कळस 

माझा किरीट झळझळीत 

पायरीचा तू दगड 

पडलास धूळ गिळीत 


अरे अरे कळसा 

जरा बघ जरा तरी 

पायरीचा मी दगड 

तुझा भाऊ गरीब जरी 


मी उंच कळस 

चढणार आकाशी 

पायरीचा तू दगड 

पडणार तळाशी 


अरे अरे कळसा 

नको गाल फुगवून बसू 

पायरीचा मी दगड 

तरी भाऊ भाऊ असू 


डौलदार मी कळस 

माझा मुकुट कसा छान 

पायरीचा तू दगड 

तुझा पैजारांचा मान 


अरे अरे कळसा 

नको झिडकारू मला 

भाऊ ना मी तुझा 

माझा दादा तू भला 


कुठे मी कळस 

मला ठेंगणे आभाळ 

पायरीचा तू दगड 

आपली पायरी सांभाळ 


कळसाचा दगड 

गर्वाने चढला 

पायरीचा दगड 

मान घालून बसला 


इतक्यात आला सज्जन 

देवदर्शन करीत 

पायरीवर बसला 

‘राम राम’ करीत 


तितक्यात आला कावळा 

पंख फडकावीत 

जाऊन बसला कळसावर 

काव काव करत



४.हे जुने जोडे 


हे जुने जोडे !

कैक दिवस यांना घातले 

आता मात्र 

हे नाही ऐकणार 

नाही राहणार 

जाणार जाणार

मोकळे होणार 


गेलीच ही टाच 

बन्दांनी बंधन दिले झुगारून 

तोंड उघडून ही शिवण 

काही करी गुप्तभेद 

खालून खिळ्यांचे 

चावती दात 

त्यांना आली चीड 


या जोड्यांनी आता 

पुकारली आहे 

असहकारिता 


यांच्या मेलेल्या कातड्यालासुद्धा 

झाली आहे का 

निराळी जाणीव ?



५.थेंब आषाढाचे आले 


थेंब आषाढाचे आले 

जग जीवनाने न्हाले 

उन्मळले सप्तरंग 

उचंबळे अंतरंग 

आले चैतन्य भरून 

शिडशडले वरून 

वर्षे जीवन निष्पंद 

स्फुरे प्राणपरिस्पंद 

जग संजीवन प्याले 

थेंब आषाढाचे आले 


आले जीवरसायन 

झाले बीज रुजवण 

कणाकणात सकळा 

उताटली जीवकळा 

काळा कातळ फोडून 

आले फुटोनिया तृण 

जीवसत्व भरा आले 

थेंब आषाढाचे आले 


फुटे फांदीला धुमार 

आला वेलीला उभार 

पानो पानी रंग आला 

आला कळ्यांना उमाळा 

आशा तरारली जरा 

नवी उमेद ये भरा 

जीव जीवनाने धाले 

थेंब आषाढाचे आले



६. अमुचे तुमचे 


अमुचे नभ कृष्ण, निळे तुमचे 

तुमचे मधु, कंटक हे अमुचे 

तुमचे रिझणे, निजणे शयनी 

झिजणे, भिजणे, थिजणे अमुचे 


जगभार शिरीं, वळ पाठीवरी 

क्रमणे पथ दूक्रम दूरवरी 

तनु रेटित रेटित जात असे 

चढणे चढणीवर हे अमुचे 


अमुचे श्रमबिंदु, अपेश भले 

अमुचे भररक्तहि घाव खुले 

भरपोट मुखी नच घास जरी 

तरी पोटभरी हसणे अमुचे 


नयने निज झाकून अश्रुमुचे 

पडले तिमिरात  निमुट वचे 

नच ज्यास कुणी म्हटले अमुचे 

जन ते अमुचे, धन ते अमुचे



७. मोलकरणीचा पोर 


मोलकरणीचा पोर हा बिचारा 

त्यास बाजूला सापडे निवारा 

जिथे भांडी घाशीत बसे माय 

तिथे त्याने ताणून दिले पाय 


शैशवांतील वाळकी श्यामकांत 

हंत, उघडी क्षुत्क्षुण्ण तनू क्लांत 

अहो अंमळ आडवा जों न झाला 

तोच बाबा! लागला घोरण्याला 


गैरसोयीच्या कोपऱ्यांत तेथे 

सर्व सोयी आराम त्यास भेटे 

क्लेश आणी आयास दिनभराचे 

तेच निद्रासुख त्यास देति साचें 


नाद भांड्यांचा होई घासतांना 

त्यास अंगाई गीत तेंच माना 

चिऱ्यावरतीं टेकली असे डोई 

तोच त्याला मऊमऊ अशी होई 


भुईवर हो पडला खडबडीत 

नरम गादी ती होय गुबगुबीत 

रातवाऱ्याचा शीतळ जो चाळा 

तोच कुरवाळा होय तया बाळा 


जिथे मानव पुरवी न दया छाया 

तिथे पाखर करि मृदु निसर्गमाया 

क्षुद्र चिंता हो क्षुद्र मानवाची 

धन्य करुणा महनीय निसर्गाची !


– रा.अ.काळेले


८. हळूच माझ्या खिडकीतून 


हळूंच माझ्या खिडकींतुन हे चान्दकिरण ठाकले 

उशालगत हे आले केंव्हा आणि कसे, नाकळे 


धवलचारुता ही रसरसती सरतीसरती पुढे 

बघून हिची चोरटी चातुरी विस्मय चित्तीं पडे 


हळूंच शिरली, हळूंच शिवली, हळूंच पडली गळीं, 

अभिसाराची कला अशीही कुणी बरे शिकवली ?


प्रथम दूर, नन्तरी निकट, मग चिकटलींच कीं मला 

खान्द्यावर, गाली मग ओंठी कले गौरकोमला 


किन्चित माझ्या उशीस शिवली या किरणांची खुशी 

त्या स्पर्शानें जड शय्याही पहाच हसली कशी !


या खिडकींतुन शुभ्र छबीचा चौकोन असा पडे 

कीं नवलाचें प्रेमपत्र हे उघडे माझ्या पुढे 


रजतपटावर रजतरसानें लिही रजत कामिनी 

रजतलेख तो वाचून झालों दंगच अपुल्या मनी 


हळूंच माझ्या खिडकींतुन कां चान्दकिरण ठाकले?

काय चान्दण्याचा कागद हा पोंचविण्या पातले?


– रा.अ.काळेले


९. मला सोडा-मला सोडा 


मला सोडा-मला सोडा !

कसा बंधनात राहूं ? 

खुल्या वाऱ्याचा पिपासू 

कसे कोण्डलेलें खाऊं ? 


बन्दिवान राहायला 

कसा- कसा होऊं राजी ? 

पिन्जऱ्यांत नान्दणारी 

जात नव्हे नव्हे माझी !


मला सोडा - मला सोडा 

कसा होणार मी वश ? 

रुसेल ना नागकन्या ? 

फणा हापटील शेष 


माझ्या फणेवर आहे 

स्वातंत्र्याचा तेजोमणी 

त्याला बन्धन पडतां 

जाय झिजोनी विझोनी 


उच्छृंखळ सुटेपण 

माझ्या कण्यांत कण्यांत

वृत्ती नाचरी नाचरी 

माझ्या कणांत कणांत 


माझ्या नितळ तनूचा 

आहे केतकीचा झोक 

चन्दनाच्या बनोबनीं 

माझा अधीरला रोख 


माझी बाकदार चाल 

आहे रानाच्या झऱ्याची 

माझी स्वच्छन्दी लहर 

आहे सैराट वाऱ्याची 


माझा गहिरा सुरंग 

त्याला संगीताची धुन्द 

माझ्या कुरळ्या कुरळ्या 

आवडीचा मुक्तच्छंद 


माझे झरकन् रिघणे 

आहे तुटल्याताऱ्याचें 

माझे सर्रकन निघणें 

आहे चपळ पाऱ्याचें


माझी सरारी तीराची 

तिला पाताळाचीं टोकें 

माझी वाट उजळती 

लक्ष हीरकमाणकें 


माझा वेढता विळखा 

घट्ट प्रेमाची पकड 

माझ्या जहरी निशेला 

गाढ तारुण्याचा चढ 


माझा बासरीचा श्वास 

माझी गरुडाशीं झुन्ज 

माझ्या रागीट फूत्कारीं 

उभे ठिणग्यांचें कुन्ज 


दर्प हिरव्या चाफ्याचा 

माझ्या उभार फणेंत 

तिच्या उगारीं राहती 

खड्ग गदा समवेत 


माझे विजेचें स्फुरण 

माझी प्रकाशाची उडी 

मला सोडा-मला सोडा 

माझी तुफान तातडी 


मला सोडा-मला सोडा 

जीव कोण्डला अन्तरीं 

मला सोडा-मला सोडा 

प्राण सोडीन ना तरी !


(म्हैसूरच्या  चामराजेंद्र बागेंतील प्राणी संग्रहालयासाठी पकडून ठेवलेल्या एका सर्पाने स्वतःच्या मुक्ततेसाठी अन्नत्याग आरंभल्याचे वर्तमान प्रसिद्ध झालें होतें. इतर कोणत्याही प्राण्यापेक्षां सर्प हा वश होऊन राहण्यास अधिक नाखुषी दाखवितो असें तज्ञांचे मत आहे.)


सन १९५४


या काही ह्या काही छोट्या कविता आहेत त्यांना राजकवी काळेले  यांनी मुक्ता हे नाव दिलेले आहे. आता त्यांना बहुतेक कणिका असं म्हणतात तर वाचूया काही मुक्ता 


१. 

कळिस दिले तूं पूर्तीचे कैवल्य 

त्वत् स्पर्शाची वोपुनि तिजला स्फूर्ती 

तूंच रविकरा आतां चढल्यावरतीं 

त्याच फुलाचें करिसी का निर्माल्य ? 


२.

त्या ऐन्यानें तुज समोर क्षण एक 

झळकविली तव मधुरमुखप्रतिमा गे 

मात्र धुळीनें जपुन ठेवले मागें 

तूं गेल्यावर तवचरणांचे अंक! 


३.


पिळून चान्दणें घडली तव तनु गोरी 

नयन निर्मिले पिळून हिरे नवकोट 

माणिक पिळुनी तुझे बनविले ओठ 

पिळून मनें गे बने हर्ष तव पोरी 


४.

दिनरजनीचा सारीपट नभिं चाले 

कीं बसला हो लेखक कोणि निनांव 

पसरून आभाळाचा कोरा ताव 

करीतसे जो पांढऱ्यावरी काळें ?  


५.

हे धरतीचे झरते हृदयउमाळें 

कुठुन  बरें हे वाहत येथें आले ?

कुठुन तरी हे असेच वाहत आले 

वाहत वाहत तीर्थ जगाचे झाले! 


६.

जुळविलीच त्यानें कविता काही नवी 

ते कवित्व मग तो पत्नीला दाखवी

"समजलिस् काय तूं ? साधा का मी कवी ?" 

ती निर्विकार चेहरा करून बोलली 

"राहूं द्या कणिका ! कणीक आधी हवी" 


७.

रसज्ञ भ्रमर, मम मधुरस तुज ठावा 

मम सुरंगनी सुगन्ध तुजला व्हावा 

तुज रसिका रे कोठून कीट दिसावा ? 

मज पोखरुनी आंत घेई जो चावा!


संकलन : अलकनंदा साने 




    सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव             (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)                   सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...