Friday, July 15, 2022

 


भालचंद्र राजाराम लोवलेकर 

(२ऑक्टोबर १९११– २४ जून १९४५)

माळव्यातील सुंदर निसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या या रमणीय परिसराची शब्दचित्रे रेखाटणारे  कवी भालचंद्र लोवलेकर हे मूळ इंदौरचे. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९११ रोजी एका मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबात झाला पदवीधर झाल्यानंतर लोवलेकर संस्थानी  नोकरीत लागले. त्यांचे बहुतेक आयुष्य इंदूरातच गेले. तिथेच विवाह, अपत्य लाभ  या घटना घडल्या. नोकरीत बदली झाल्यामुळे ते महेश्वर या गावी एकटेच जाऊन राहिले. तिथे असतानाच त्यांना कॉलरा झाला आणि तडकाफडकी काही तासांच्या अवधीतच २४ जून १९४५ रोजी मरण आले.

भालचंद्र लोवलेकर गेल्यानंतर त्यांचे स्नेही हिन्दी - मराठीतील नामवंत लेखक प्रभाकर माचवे यांनी बडोदे येथून प्रसिद्ध होणाऱ्या ''अभिरुची'' मासिकाच्या ऑगस्ट अंकात त्यांच्यावर एक हृदयस्पर्शी लेख लिहिला. एकोणीसशे बेचाळीस साली ''अभिरुची'' या लहानशा पण चोखंदळ मासिकात लोवलेकरांच्या कविता प्रसिद्ध होत असत. ह्या मासिकात लिहिणारे अनेक लेखक नंतर नावारूपास आले. त्यापैकी मं. वि. राजाध्यक्ष,पु. ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ,व्यंकटेश माडगूळकर, शांता शेळके वगैरे काही ठळक नावं आहेत. लोवलेकर यांचे निधन अल्पायूत झाले आणि त्यांच्या जीवित अवस्थेत पुस्तकाचे प्रकाशन होऊ शकले नाही. ते गेले त्या नंतर इंदूरमधील त्यांचे चाहते व मित्र यांनी "लोवलेकर स्मारक मंडळ" स्थापन केले. ह्या मंडळाने  १९५३ साली त्यांच्या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती  प्रकाशित केली होती. ह्या पहिल्या आवृत्तीसाठी ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांची प्रस्तावना लाभली होती.

जीवाला खडबडीत हिरा म्हणणारे भालचंद्र लोवलेकर यांच्या चोरलकाठ ह्या काव्यसंग्रहाच्या  पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना  वि.स. खांडेकर यांनी लिहिली होती. प्रस्तावनेत ते म्हणतात की लोवलेकर जातिवंत कवी होते. आयुष्य लाभलं असतं तर तांबे, बालकवी आणि गोविंदाग्रज यांच्या परंपरांचा सांभाळ त्यांनी चांगल्या रीतीने केला असता. त्यांना कल्पकतेचे देणे चांगले मिळाले होते. एखाद्या पाखराची गोड किलबिल ऐकू येते न येते तोच ते भुर्रकन उडून जावे तशी लोवलेकरांच्या बाबतीत मराठी रसिकांची स्थिती झाली. 
२०.११.५३  

प्रथमावृत्ती हातोहाती संपली. त्यानंतर त्यांच्या काहीशा दुर्मिळ झालेल्या या कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती काढण्याचा विचार मध्यप्रदेश मराठी साहित्य संघाच्या कार्यकारिणीने केला. त्यांच्या कवितांची हस्तलिखितं मिळवून आणि त्यातून कवितांची निवड करून या कार्याला साहित्य संघाने मूर्त स्वरूप दिलं, त्यात सर्वश्री माधव साठे, माधव जामदार, डॉ. चंद्रकांत पांढरीपांडे यांचा विशेष सहभाग होता. या संग्रहाची दुसरी आवृत्ती ही केवळ पहिल्या आवृत्तीची पुनरावृत्ती नाही. एवढे मात्र नक्की आहे की पहिल्या आवृत्तीतील साऱ्याच कविता, दुसर्‍या आवृत्तीत समाविष्ट केल्या असून पहिल्या आवृत्तीत नसलेल्या पण काही मासिकातून प्रकाशित झालेल्या आणि अप्रकाशित कवितांचाही यात समावेश केला गेला आहे.      

रविकिरण मंडळाच्या काळात कवी लोवलेकरांची कविता महाराष्ट्रातील अनेक मासिकातून प्रकाशित होत होती. सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांचे तर ते विशेष आवडते कवी होते. दुसऱ्या आवृत्तीसाठी शांताबाईंनी  प्रस्तावना लिहून दिली आणि इतकंच नाही तर परिश्रमपूर्वक जुन्या मासिकातून  लोवलेकरांच्या प्रसिद्ध झालेल्या परंतु प्रथम आवृत्तीत नसलेल्या कविता मिळवून दिल्या. दुसऱ्या आवृत्तीसाठी  लोवलेकरांच्या मुलांनी सर्वश्री अंशुमाली, विश्राम व डॉक्टर किशोर यांनी अतिशय आनंदानं स्वीकृती दिली, एवढेच नव्हे तर यासाठी लागणारा सर्व आर्थिक भारही आनंदाने उचलला.  ह्याच कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती 1994 साली प्रसिद्ध झाली. त्याला शांताबाई शेळके यांची तब्बल १५ पानांची प्रस्तावना लाभली. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात की लोवलेकर वयाच्या 34 व्या वर्षी जग सोडून गेले. त्यांचे व्यावहारिक आणि कौटुंबिक जीवन चारचौघांसारखेच होते. एक संसारी माणूस म्हणून लोवलेकरांनी तसे सरळ साधे जीवन व्यतीत केले पण आपल्या या अत्यल्प आयुष्यात कवी म्हणून, कलावंत म्हणून त्यांनी जे काही संपादन केले ते फार वैशिष्ट्यपूर्ण आणि लोवलेकरांच्या अंतरंगाचा स्पष्ट परिचय करून देणारे असे आहे. ते अंतर्बाह्य आणि अभिजात कवी होते. वर वर साध्यासुध्या दिसणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाआड जातिवंत रसिक आणि अस्सल प्रतिभाशाली कलाकार दडलेला होता.
१९९४
 
भालचंद्र लोवलेकरांच्या वृत्तीत कलावंताचा बेछूट कलंदरपणाही होता. इंदौरमधील आपल्या बि-हाडाच्या माळ्यावर संथ  बेफिकीरपणाने हुक्का ओढत बसणाऱ्या लोवलेकरांचे,प्रभाकर माचवे यांनी ह्रद्य वर्णन केले आहे. लोवलेकरांचा दुसरा छंद म्हणजे निरुद्देश फिरणे. मित्रांबरोबर ते इंदौर भोवतालच्या परिसरात मैल न मैल फिरत. दूर दूर भटकत आणि एखाद्या आवडीच्या ठिकाणी बसून सोबत असलेल्या मित्रमंडळींच्या बरोबर तास न तास गप्पा मारण्यात रंगून जात. असेच एकदा इंदौरच्या राहुल बारपुते इत्यादी मित्रांबरोबर फिरत फिरत ते जवळ जवळ २२- २३ किलोमीटर लांब असलेल्या महू पर्यंत गेल्याची त्यांची आख्यायिका सांगितली जाते. आपल्या जीवनातला हा धुंद कलंदरपणा लोवलेकरांनी कवितेतही पुरेपूर उतरवला आहे. 

लोवलेकरांच्या कविता वाचताना त्यांचे पहिले वैशिष्ट्य जाणवते ते म्हणजे त्या कवितेतील एक धुंद उत्फुल्ल मनोअवस्था. 'तरुण मनाची उनाड गाणी गाणारा शाहीर' असे जे एका कवितेत त्यांनी वर्णन केले आहे ते स्वतः त्यांनाच चपखलपणे लागू पडते. लोवलेकर ऐन तारूण्यात कविता लिहू लागलेत आणि तारुण्यातच त्यांचा लेखनप्रपंच आटोपला. त्यामुळे या कवितेत प्रौढ वयातील परिपक्वता आणि चिंतनशीलता जरी उतरलेली नसली तरी तारूण्यातला जीवनोल्लास मात्र भरपूर भरलेला दिसतो.

लोवलेकरांच्या निसर्ग कविता आणि प्रेम कविता जितक्या रम्य उत्कट आहेत त्यामानाने इतर विषयांवरील त्यांच्या कविता परिणामकारकेत काहीशा उण्या पडतात. भोवतालचे समाज जीवन लोवलेकर बघत होते त्या संबंधी त्यांच्या काही प्रतिक्रियाही होत होत्या. धर्मविषयक चिंतनही त्यांच्या काही कवितांत प्रकट झाले आहे. परमेश्वराबद्दलची आपली भावना व्यक्त करताना लोवलेकर म्हणतात "मी अदेववादी"

लोवलेकरांच्या शैलीच्या संदर्भात थोडा विचार करायला हवा. या शैलीची शब्दकळा, तिची प्रतिमासृष्टी यात एक अनोखे वेधक सौंदर्य आढळते. माळव्यातील रहिवासामुळे लोवलेकरांच्या कवितेत हिंदी मराठी मिश्रित शब्द व शब्दसंगती यांचा वापर अनेक ठिकाणी झालेला आहे. मकराण, आरस्पान, आंधी, रंग-बिरंगी, मेहताबा, खुमार,अदा असे खास हिंदी वळणाचे शब्द त्यांच्या कवितेत सापडतात.

लोवलेकरांचे काव्य जवळजवळ पंचाहत्तर वर्षांपूर्वी लिहिले गेले. या मधल्या काळात आशयापासून ते आविष्कारापर्यंत, भाषाशैलीपासून ते प्रतिमासृष्टीपर्यंत मराठी कवितेत अनेक परिवर्तने होऊन गेली. ती अंतर्बाह्य बदलली. हे सारे संस्कार पचवलेल्या मराठी काव्यरसिकाला आता लोवलेकरांचे काव्य कसे वाटते ? आश्चर्याची गोष्ट ही की आजही लोवलेकरांच्या काव्याची जादू अम्लान राहिली आहे असे प्रत्ययास येते. ते अकाली गेले. कवितेची बीजे त्यांच्यात नुकती अंकुरू लागली होती. त्यांचा विकास अद्याप झाला नव्हता. त्यामुळे परिपक्व चिंतनशीलतेचा, जीवनविषयक वास्तविक भूमिकेचा या कवितेत अभाव आहे. काळाच्या ओघात लोवलेकरांची कविता एका विशिष्ट जागी स्थिरावली आहे, हे मात्र नक्की.

ह्या कविता सादर करताना लोवलेकरांची माहिती त्यांच्या काव्य संग्रहातून आणि इतर भाष्य संग्रहाच्या द्वितीय आवृत्तीसाठी शांताबाई शेळके यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतून घेतले आहे.


 अंबरवात

अफाट उघड्या मैदानात 

या टोकाहुनि  त्या टोकास

असा सारखा चोविस तास

फिरे झिंगला अंबर वात 


पूर्वेच्या खांद्यावर हात 

दुजा पश्चिमाराणि करात 

 पिंगा घेई गाणे गात 


आकाशाला लावी हात

 पाय हालवी उन्मादात 

मजेदार हसे झोकात 


हिरव्या गवतावरती पाय 

अल्लद टेकुन चालत जाय

 ज्वारीची थरथरते पात 


क्षितिज रवी तो कंपे खात 

खुळ्या जिवाच्या या मेण्यात 

आशेची थरथरते वात 


वातावरणी मेघ उदास 

श्वासांवरती विरली आस

 वारा झुलवी हातोहात 


या टोकाहून त्या टोकास 

असा सारखा चोवीस तास 

फिरे झिंगला अंबरवात.


वेळूवनामाजी

वेळूवनामाजी
उंच वृक्ष झुंडी 
वेडा वायू धुंडी 
काहीतरी.

गंगाराणी नाचे 
भेदरला शशी 
थैमान आकाशी 
घाली वारा. 

एखादा एकाकी 
जळचर धावे 
पिंजुनी हेलावे 
वाऱ्यावरी.

पिंपळाची पाने 
सळसळा वाजती 
फडफडा फाटती 
रानकेळी.

झुडुपाच्या आड 
भागुबाई ससा 
रोखितो उसासा 
बाळदृष्टी. 

चिरीकपारित 
लहानुले मासे 
थोर बळी खासे 
खेळतात. 

लाटांचे लोळण 
वरी ताराकण 
धावे रागावून 
नागसेना.

नावेला खलाशी 
कमालीचा जपे 
त्याची राणी झोपे 
गोड गोड. 

आली एकदाची 
किना-यासी नाव 
भिंतीसी रिघाव 
नाही आता. 

पिळदार बाहू 
दगडाची छाती 
आलिंगी एकांती 
चुंबी डोळे.



चोरलकाठ

चोरलकाठ
पाउलवाट 
हळुहळु जाईल श्यामा राणी 
घाटावर आणाया पाणी 

हरळी दाट 
मऊ सपाट 
झिम्मा झिम परि फुगड्या फेरी
स्वच्छंदाने कधी दुपारी 
जमुनी खेळती बुज-या पोरी 

उंच उजाड 
पिंपळ झाड 
ढौळी फांदी आणुनी बांधी 
नवा नारळी जाडा दोर 
झोके काढिल अल्लड पोर 

कपिला गाय
डौली जाय 
शेपुट चवरी अलगद फेरी 
फिरेल वळवित मालवणात 
खुळ्या प्रितीची गाणी गात 

झुरुमुरु धार 
दूध चिकार 
भरून कटोरा अहीर गोरा 
देता डोळा बोटे चार 
'नको नको' चा नाजुक मार 

सहज मधून 
दिसलि म्हणून 
चंचल पाणी मोहक छाया 
खुपरे डोळे रोखुनी कोणी 
पाहत राहील जंगलराणी.    



मंदिरात

तुझ्या मंदिरात
वाद्यांचा गजर
दीपावली थोर
आरासली.

तुझ्या मंदिरात
तुला ओवाळिती
करीती आरती  
उच्च स्वरे.

तुझ्या मंदिरात
भक्तजन गाती
मंत्रून टाकिती
पुष्पाक्षता.

तुझ्या मंदिरात
तुझेच सोहाळे
तुझ्यारुपी डोळे
स्थिरावती.

माझ्या मंदिरात
देव नाही कोणी
अंधाराची राणी
वेरझारी.

माझ्या मंदिरात
नि:शब्द शांतता
नाही ओवाळीता
कुणा कोणी.

माझ्या मंदिरात
मानवी दुःखांची
अश्रूपुष्पे साची
वर्षतात.

माझ्या मंदिरात
कशाचे सोहाळे
कुणासाठी डोळे
हपापले.     



गगन


 चिराश्चर्य !  वर उंच  गगन! 


चवथीच्या ठसक्याची चंद्रकोर 

फेकिले सारखे स्नेहदोर 

धवल रम्य ते त्वरित जलद 

अवगुंठिति नभ अलगद 

स्वप्न रुचिरा धरा 

नि स्मृतीचा कंप उरा 

एकांतिक आसमंत गहन गहन ।।१।।


गोंगाटी  शहर उरे मैल दूर 

उन्मादित चुंबनरव ये मधुर 

वाळवंटसा सरे दिवस 

कवळिती दृढ बाहुपाश 

स्वच्छ चंद्रप्रभा 

नि विवस्त्र तनुशोभा 

उल्लंघिति  विप्रलंभ रमणी रमण ।।२।।


मध्यरात्र पडशाळेची किनार 

उंच उभ्या लिंबाचा जीर्ण पार 

जीवव्याधीने क्रांत पथिक  

अर्धशुद्ध नि:श्वास क्षणिक 

भंगे से जीवपात्र 

नि चांदणी फुलेरात्र 

गगनाची आळवी दे मरण मरण ।।३।।


डोहावर नर्मदा प्रवाह संथ

नि चांदरात ही शोभिवंत 

ये दूर दूर देवालयीन 

गंभीर घोष अत्यंत क्षीण 

मुक्त चिंता जरा 

तंद्रिलता ये शरीरा 

व्यर्थच उच्छृंखल मन करि चिंतन ।।४।।



मांडवगड

फिरवावे हल्ले प्रबळ शत्रूचे ज्यांनी
त्या जीर्ण भंगल्या दगडी द्वार कमानी 
उभे दुतर्फा उंच तरू
भेटवा वांछिती गगन धरू 
चालून वर ये वाटसरू 
विस्तीर्ण पठारी इतिहासाची छाया 
अन् थंड भुयारी जल निर्मल प्राशाया 
पर्वती वर्तुळे हिरवी कमललतांनी 
मांडूनि जिंकेले जळी नभाला त्यांनी 
मधे एकटी कमळकळी 
कडेस बगळा मीन गिळी
लांब टेकडी रांग निळी 
चौफेर पसरले खांब आणि खिंडारी 
प्रासाद सावली संथ हले कासारी 

सोनेरी पिकल्या भुरक्या गवतवनात 
खिल्लारे चारीत बाळभिल्ल ये गात 
हंबरतो गोवत्सगळा 
आकाशाचा साज निळा 
प्रसन्न मांडवगड सगळा 
हे मध्येच उठती उंच घुमट पाषाणी 
सांगती युगांना अपुली मूक कहाणी 
 
भुईटेक  माजले शिताफळांचे रान 
ह्या उगीर प्रांती माळ खगांचे गान
शिखर बिंदूला रुपमती 
करी दृष्टीला विहगवती 
प्रदेश धूसर लांब किती 
किरणात झिंगला सांजवायू बेभान 
आसमंत घुनवी रहस्यमय हो रान 

माथ्यावर काळा माठ नेसणी लाल 
भिल्लीण मृगाक्षी निर्भय ठुमरी चाल 
निवांत जागी पाणवठा 
बुडुम बुडुम रव स्पष्ट घटा 
प्रतिरवती मग दगड विटा 
ह्या प्रचंड दगडी शाही महालापाठी 

शेवाळे थिल्लर मांडी हिरवी दाटी.


सरितेकाठी 


उन्हात बसून सरितेकाठी शांत रवंथ गुरे करिती
किलकिल करुनी डोळे मंजुळ जलनादी मन गुंगविती

पिसाट वारा शुद्धित येउनी सभ्य चाल धरि संथ अशी 
वृक्षमुळीवर डोके टेकुनि गोप झोप घे हवी तशी 

चंचल नीरा अचळ काळसर शिळा बघे, घेई बांक 

तुटल्या झिजल्या कड्यावरुनी किडा करीत 'माती टाक'


अलगद वरच्यावरी काढुनी दिसतील ना दिसतील जळी 
अशा बांगड्या दावूनि झाकुनि हळूच चाले नादकली 

मऊ मऊ अन हिरवी तुडवी नवी नवी गवती पाती 
खोड वडाचे दगडी गोटे पाहुनी बिचके मात्र अती 

बाजुबाजुनी जाई त्यांच्या सावरीत लवचिक तनु 

मनासारखा प्रियकर मिळता खुशाल उधळी इंद्रधनु 


काठावरून तरणाताठा आम्रतरू कलवी फांदी 

जलभालासी हळू नजराणा करी बिजोरा अन बिंदी 


परंतु बघुनी आपली छाया विस्कळलेली पाण्यात 
'पुढेच जा तू कपटी राणी' म्हणून फिरवी मग हात 

तळमळणारा किरण रवीचा पाण्यामाजी घेइ बुडी 

ताप जाहला शीतल, चम् चम् झाक मात्र पडली उघडी 


लिंबावरुनी झर्रकन् उतरे गदर बावळी लिंबोळी 

निवांत लहरीवरी नदीच्या किरणासंगे नाच करी 


दोन ओंजळी पिउनि पाणी गवळ्याचा तरणा पोर 

मुंडासे करि नीट, सावरी काठी, मिशांची पिळे कोर 


शिरावली घेऊनी गाठळी विळा घेऊनी हातात 

पुढती टाकी पाय प्रिया, तो तिच्या सवे आनंदात 


खिल्लारांना मधेच चक् चक् करुनी वळतो आणि मग 

फिरूनी उरते तिशी बोलता तिचे आणि त्याचेच जग.




नीर संथगति


नीर संथगति, खाली दिसते तळ भिंगावाणी 

वरी लांबशी फांदी आली डोलत मृदुपर्णी 


दो बोटांमधि लांब धरुनिया रुमाल की हिरवा 

कुणी नवती अप्सरा पातली नाच करी बरवा 


वायु वाहवी मंदमंदशा लहरी तरल अशा 

की स्वर्गीचा देवदूत करि गाऊनी साथ जसा 


गगना मधूनी हेमकरी हा करी वादनाला 

छेडूनि तारा सारंगीच्या सारंगीवाला 


अहा! हालली पाने नव ती कोमल शाखेची 

करांगुल्या नाचल्या नर्तकी हावभावनाची 


हावभाव की अदा करूनिया छुमछुमली 

पाने चिवचिव हसली कलकल 

खिदळत हलली मोदाने.




ताज्या सारवलेल्या भूमीवर 


ताज्या सारवल्या भूमीवर जशा अक्षदा लाख हजार 

तशी पसरली नभांगणावर ही नक्षत्रे अपरंपार 


गडद तमाच्या भेसुरतेचा भर्पूर भरलेला बाजार 

काय दाखवायाला केला लख् पक् रत्नदिव्यांचा हार 


सुपीक काळी मध्ये पेरली ज्वारबिजे ही रुचिराकार 

वाट न्याहळित हंगामाची अंधाराचा हा कृषिकार


चिमुरडी 


लावुनि जिभेला घडी घडी शिसपेन 

का कपाळ अपुले दाविसि पत्र लिहून 


पहाल का करते कसे लुकलुके डोळे 

हज्जार मेलीला हवे कराया चाळे 


नकलात जाहली अशी एक तरबेज 

या चिमुर्डीस हो कशास लिहिण्या मेज 


पहा कशा भोवया केल्या या वाकड्या 

अन् थेट नाकिच्या मोठाल्या करी पुड्या 


जरी अजून चारही पुरते नाही वय 

खपणार नाही हजेरीत जर हयगय.




मी अदेववादी 


मी अदेववादी माणूस, कसली पूजा करविता ?


देवळात कुठला देव ? 

विश्वास मनुष्यस्वभाव 

सब देवबीव थोतांड  

कोठला कर्ता करविता ? 


चौगर्दी भाविक लोक 

गातात सुरावर एक 

पण ह्रदयामधला सूर न मिळता 

सर्व कपटपटु  बाता ! 


संशयात जीवन झाले 

भिरकवी तबक भरलेले 

अन तडक निघून 

उतरुनि पायऱ्या गाठावी सरिता. 


बस्स! नको अता देऊळ 

धर्माचे तसले खूळ 

चुळबूळ मनाची निरवि 

कुठे ती समाधान-वनिता !




पटांगणामधि रंग बिरंगी


पटांगणामधि रंग बिरंगी मेहताबा 

उरी धरीशी का मशाल जळकी तू बाबा

काबा, विष्णू विठ्ठल सारे कृष्णतम

 तेज: स्मृतीची कबर, तोच झाला धर्म 


चिंचराईतिल चिंचोळी माझी वाट 

मळलेली, मलमल सदरा मुंडे छाट 

गोखरूमय पंथावरचा वाटसरू 

वहाण नाही वाहन कुठले ! काय करू?


ओढ्या माजी पाऊस धारा पडणार 

ढवळून वरती माती माती येणार 

नयनांमधूनि ओघळणाऱ्या अश्रू सरी 

ह्रदांदोलनी आशा रक्षा मातकरी 


घरभर भिरभिर उडालाच हा पाचोळा 

निरर्थ आशा फडफडते चिंधीचोळा 

असतील भोळ्या दुनियेचे सारे देव 

खरे निराशा मंदिर, तेथे मद्भाव !



जीव जावो, राहो जीव जावो, राहो एक भाव माझा ह्रदयीचा राजा सिंहासनी. सारे दैवफळ किडाळ जहाले तरीही न हाले निश्चयो हा. रोष,तोष-भाषा लोप झाला आता दूरवावी व्यथा याचना ही. उचलली लाथ मस्तकी झेलीन गुणगानी लीन होईन मी. भवितव्य राहू आशा-शशी ग्रासी तरी पायापाशी चित्त राहो. आभाळाचे नीळ कोसळो का शिरी प्रेमाची फकिरी अनुस्यूत. चित्ताचा चंडोल चढे वरी वरी नाकारीत शिरी विंधू नको. कोवळ्या मनाचा त्रिखंडात डंका पटे दाद रंका मिळाल्यास. त्वदंगणी माझे ह्रदय शिंपण स्वार्थाचे तर्पण मनोभावे.

हा असा पुढे जाणार हा असा पुढे जाणार ।
बघू द्या कोण मला धरणार? घन घाट वनश्री ह्रदयी।
सौंदर्य रत्न जे राही।
शोधात तयाच्या जाई।
हुडकुनी तया लुटणार।। हिमगिरी प्रदेशी स्वैर।
भटकण्यास होइ तयार।
उत्तुंग शृंग चढणार।
आनंदरसी न्हाणार।। नभचुंबित दृमराशीचे।
पर्ण पर्ण हिंडुनि साचे। गहन गूढ विश्वांतरिचे।
उकलुनी करणार।। खग समूह उंचच उंच।
उंचाहुनि अतिशय उंच।
उडतात वासुनी चोच।
मी साथीदार होणार।। सरितापति शांत प्रशांत।
शांततेस नाही भ्रांत। बुडि घेत अफाट जलात।
मी शांतिमधे विरणार।। रात्रीच्या रंगमहाली।
माणिके नि मोती ल्याली। नव इंदुकला जी सजली।
मी तीत लीन होणार।। काळोखकळी उमलून।
श्री उषाराणी आतून।
अरुणास बघे हासून।
ते हास्यच मी होणार।। खग पुंज युक्त शाखांना।
किलकिलाट कुहुकुहुताना
ऐकताच मन मानीना।
किलबिलाट मी होणार।। सुप्रभात वायु मंद।
तटतटा तोडी ह्रद् बंध। चहुकडेहि धुंदच धुंद।
धुंदीत धुंद होणार।। वाऱ्यावर होऊनी स्वार।
ब्रम्हांड फोडुनी पार।
हुडकीन शून्य बडिवार।
जे अगम्य ते घेणार।। मेघांची उडती गादी।
त्यावरि मम होय समाधी।
मोहनता मन साधी।
मी प्रसन्न मग होणार।। शून्याहून खाली असलो।
शून्यासी फोडुनी घुसलो।
शून्य गोलि रमलो भ्रमलो।
तिथुनही पुढे जाणार।।

संकलन : अलकनंदा साने

 

गोविंद झोकरकर

(२१ ऑगस्ट १९१२ - १२ मार्च १९९५)

गोविंद झोकरकर यांच्या लिखाणात आपल्याला जुनी भाषा आणि शैलीचा सुरेख संगम आढळतो. त्यांनी लेखनाचे वेगवेगळे प्रकार जरी हाताळले असले तरी ते मुख्यत्वे कवी म्हणूनच ओळखले जातात. येथे ज्या कविता सादर करणार आहे, त्या त्यांच्या "अजूनी दिसता गुलाब सुंदर" ह्या संग्रहातून घेतल्या आहेत. संग्रहात प्रुफच्या अगणित चुका आहेत. मी माझ्यापरी सुधारणा केल्या आहेत, तरी जर काही आढळल्या तर अवश्य निदर्शनास आणाव्या, म्हणजे ब्लॉगवर शुद्ध भाषेत संकलित करता येतील.

कै. गोविंदराव  झोकरकर यांचा जन्म २१ ऑगस्ट १९१२ रोजी देवास येथे झाला. १९३६ साली देवास संस्थानाच्या मराठी शाळेचे मुख्याध्यापक या पदावरून नोकरीला सुरूवात झाली.त्याच दरम्यान संस्थानाच्या राज परिवाराचे 'रॉयल ट्यूटर' म्हणून नेमणूक करण्यात आली. नंतर देवास संस्थानाचे प्रिंटिंग प्रेस अधीक्षक म्हणून काम केले. 

संस्थानांच्या  विलीनीकरणानंतर गोविंदराव झोकरकर यांची ग्वाल्हेरला बदली झाली. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे बदलीच्या ठिकाणी जाता न आल्याने नोकरी सोडावी लागली. या काळात त्यांनी विश्वविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी विषयांचे अध्यापन आणि मार्गदर्शन केले.

१९४६ मध्ये देवास संस्थानाच्या राजकवी या पदाने गोविंदराव झोकरकर यांना सन्मानित करण्यात आले.मराठी वाङ्मयात त्यांचे नाव आदराने घेतले जात होते.  महाराष्ट्रातील प्रमुख मासिकं हंस, वांङ् मय शोभा, मनोहर, यशवंत, सह्याद्री, ज्योत्स्ना, अंजली वगैरेतून  त्यांच्या कविता नियमित  प्रसिद्ध होत होत्या. लोकसत्ता व इतर वर्तमानपत्रांतून त्यांचे काही लेखही  प्रसिद्ध झाले. 

झोकरकरांच्या कामाचा आवाका बराच मोठा होता. त्यांनी विख्यात इंग्रज लेखक ई. एम. फॉर्स्टर यांच्या "पॅसेज टू इंडिया" या ग्रंथाचा लेखकाची परवानगी मिळवून मराठी अनुवाद केला. कै. द.वा.हरणे, नागपूर यांच्या चरित्रकाव्याचे संपादन केले आणि ते १९४४ साली ''स्मृतीकुंज'' ह्या नावाने प्रसिद्ध झाले. १९४७ साली  ''स्वातंत्र्य'' ह्या मध्यभारतीय मराठी हिंदी मासिकाचे  संपादन केले.त्यांच्या काही कवितांचा मॅट्रिक आणि इंटरमिजिएटच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव केला गेला.

महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरच्या विद्यमाने भरणाऱ्या शारदोत्सवाच्या पाचव्या अधिवेशनात १० नोव्हेंबर १९५१ या दिवशी अध्यक्षपदावरून बोलताना झोकरकरांनी  सांगितले की अवलोकन, वाचन, मनन, स्पंदन व आविष्करण या पाच पायऱ्या कविता लेखनात फार महत्त्वाच्या आहेत. खूप पहावे, खूप वाचावे. त्यावर खूप विचार करावा. भावनांचे आवाहन, हृदय स्पंदन करू लागले की त्या तंद्रीत तासनतास दिवसेनदिवस घालवावे आणि एक दिवस ही ह्रदयाविष्करणे कागदावर उतरवावी . गाय वगैरे प्राणी जसे रवंथ करतात तसा भावनांचा रवंथ कवीला करावा लागतो आणि त्यातूनच कवितेचं ईप्सित साध्य होतं.

गोविंदराव झोकरकर यांची साहित्यसंपदा 

१.काव्य कणिका (१९४२) 
२.टेकडीच्या पायथ्याशी (काव्यसंग्रह १९५१) 
३.गोविंद झोकरकर यांच्या निवडक कविता (काव्यसंग्रह १९८२)
४.अजून दिसतां गुलाब सुंदर (समग्र झोकरकर २०१२)

गोविंदराव झोकरकर ११-१२ मार्च १९९५ रोजी उज्जैन येथे होणाऱ्या प्रांतिक मराठी साहित्य संमेलनाचे  नियोजित अध्यक्ष होते, पण विधीलिखित वेगळं ठरलं होतं. नेमकं १२ मार्च या दिवशीच त्यांचे आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या मृत्यूनंतर लोकसत्ता  वृत्तपत्राने ह्या बातमीची दखल घेतली आणि त्यावेळेसचे संपादक माधव गडकरी यांनी  एक हृदयस्पर्शी लेख लिहिला. त्या लेखाचा काही अंश ---

गेली पन्नास वर्षे वेगवेगळ्या वृत्तपत्रातून आणि नियतकालिकातून ज्यांच्या कविता आणि लेख प्रसिद्ध होत असे, असे विसर्जित देवास संस्थानचे राजकवी  श्री.  गोविंद झोकरकर यांचे दिनांक १२ मार्च रोजी इंदूरच्या एका रुग्णालयात निधन झाले. राजकवी चंद्रशेखर, राजकवी भा. रा. तांबे, राजकवी यशवंत, राजकवी काळेले या परंपरेतील शेवटचा राजकवी काळाच्या पडद्याआड गेला. महाराष्ट्रापासून दूर राहणाऱ्या लेखक-कवींना मराठी रसिकांनी आपले कौतुक करावे असे नेहमी वाटत असते. मुंबई-पुण्यातील सामान्य कवींना जितकी प्रसिद्धी आणि मोठेपणा मिळतो तितका उत्तरेतील लेखक-कवींना मिळत नाही. १९४७ मध्ये मी "क्षितिज" हे मासिक ठाण्याहून सुरू केले तेंव्हा पहिल्याच अंकात गोविंद झोकरकर यांची कविता प्रसिद्ध केली होती. माझे चुलत बंधू देवास मध्ये राहत होते त्यांनी ती कविता पाठवली होती. पुढे देवासला जाण्याचा योग आला. खुणावणारी दोन घरे तेथे होती. एक कुमार गंधर्वांचे आणि दुसरे कवी झोकरकर यांचे. त्यांच्या मृत्यूनंतर दिनांक 9 एप्रिल रोजी मी इंदूर मध्ये होतो. उज्जयनी आणि देवासला जाणार होतो परंतु गेलो नाही. उज्जयनीच्या क्षिप्रेत पाणी नाही आणि देवासला गंधर्व आणि कवीही नाही. मग मनात आले जायचे कशाला ?  

दूरवरच्या कवी मित्राला निरोप.

माधव गडकरी (लोकसत्ता दिनांक १४ एप्रिल १९९५)

गोविंद झोकरकर यांच्या निधनानंतर त्यांचे सर्व साहित्य गोळा करून त्यांच्या कुटुंबीयांनी ''अजून दिसतां गुलाब सुंदर'' ह्या नावाने  २०१२ मध्ये पुस्तक प्रसिद्ध केले. एकूण ७ खंडाच्या ह्या पुस्तकात त्यांच्या काही कविता, निवडक भाषणे, प्रसिद्ध झालेले लेख, साहित्यिक,मित्र,कुटुंबीय यांच्या ह्रद्य आठवणी,त्यांना आलेली निवडक पत्रे, इंदूर नभोवाणी केंद्रावरून प्रसारित झालेली व्याख्यानं आणि विशिष्ट  छायाचित्रं आहेत.


तू आणि मी

तू इंदूची विमल प्रभा मध्यान्हीचे मी ऊन गे 
गद्यातले नि काव्य तू पद्यातले मी गद्य गे  

जुईचे सुकोमल फूल तू कोरांटी काटा मी उभा 
लाजाळूची मृदु वेल तू मी वृक्ष चिंचेचा उभा 

तू गायनी सुरमाधुरी मी ताल ठेक्यातील गे 
बागेसरी सुरीलीच तू मी भैरवाचा राग गे 

चित्रांतली अरुणच्छटा तू मेघ काळा मी वरी 
दंवबिंदू तू सुम-शुभ्रसा मी गार बर्फच फत्तरी

विधुचीच सुंदर तू कला मी डाग काळा त्यावरी
हनुजागीची खळी गोड तू मी तीळ गे गालावरी

सरिता विशाल नि मुग्ध तू गे बोलका मी धबधबा
तू शुभ्रवर्णी पौर्णिमा अवसेतला मी कालिमा. 



गुराखीण

डोईस दुधाची चरवी आणिक लोणी 
वादळी सापडे गुराखीण वनराणी 

ती गव्हाळ कांती नेत्र सशाचे भोळे 
नाचती कपोली केसही काळे काळे 

फडफडे ओढणी पिवळी कुमकुम भाळी 
ही मौज बघाया जमे ढगांची टोळी 

नसनसी साठली तिच्या नवी मधुज्वानी 
कोसळे वरोनि धो धो धो धो पाणी 

दातात तिच्या हुडहुडी मुखावर लाली 
वृक्षावर हलते जास्वंदाची जाळी 

मेघातून कोणी तिजला गारा हाणी 
तुडवीत चालली पायी ओहळ पाणी 

ह्रदयात तिच्या गुंजते प्रीत बासरी 
पवनाची भिरभिर साथ तियेला करी.


कोजागिरी

नव पातली मनमोहिनी सुखदायिनी मधुयामिनी 
धवलांकिता कोजागिरी ये आजला प्रियदर्शनी 

सरी संपल्या त्या श्रावणी शरदातली ये शिरशिरी 
उत्कंठिता वनी धावती दुथडी किती जलवाहिनी 

वसनी नव्या हिरव्या सजे ही श्यामला सृष्टी सखी 
किती मोर दंग ही नर्तनी बकुळी फुले उन्मादिनी 

बसुनी मुदे सौधावरी ज्योत्स्नेमध्ये जन नाहती 
कुणी सुस्वरे आलापिती मधुरागिणी सुरमोहिनी 

हासुनी कथिति किती गुजगोष्टी प्रेमळ भाषणी 
किती आग्रहाने प्राशिती दुग्धामृता ते अर्पुनी 

श्रम संपले दिवसाचिये अन् दूर होती काळज्या 
संतोषवी हदयात शितल चंद्रिका आल्हादिनी

सण हा करू प्रिय साजरा जोस्त्नामहोत्सव रंगुनी 
स्मृती हीच देईल चेतना क्रमया, क्रमण्या पुढे जीवनी.


नवा चंद्र

शब्द जुने जरि अर्थ नवा 
विश्व जुने जरि चंद्र नवा 

नव्या जुनाचा जुनाच गोंधळ 
वृद्ध तरुण हा विचार पोकळ  
प्रयोग केवळ बौद्धिक वळवळ 
वंश जुना जरि देह नवा 

अतर्क्य अद्भुत प्रभूची लीला 
खेळ करी तो भुलवी सकला 
नर नारी बाहुली बाहुला 
मंत्र जुना जरि जादू नवा 

जुन्या नव्याची व्यर्थच भाषा 
कन्या आशा आई निराशा 
बापच कारण पुत्र विनाशा 
पाणी जुने जरि पूर नवा 

काय नवे नि काय पुराणे 
प्रेम नवे की प्रेम पुराणे 
कोण शहाणे कोण दिवाणे 
रोग जुना जरि वैद्य नवा 

मर्त्याला अमरत्व कशाला 
नवा व्याप संताप कशाला 
जुना चंद्र मग नवा कशाला 
मरण जुने जरि जन्म नवा.



श्रांत पथिक

एकलेच यायचे
एकलेच जायचे
मागुती न पाह्यचे
पुढे पुढेच जायचे

कितीक दूर मार्ग हा
कधी न संपणार हा
कधी इथे न राह्यचे,
पुढे पुढेच जायचे.

सगे न सोयरे कुणी
आप्तमित्र ना कुणी
कुणी कुणा न ओळखे,
जगात सर्व पारखे.

न प्रेम, उग्र अग्नी हा
करील भस्म जीव हा
कितीक जीव पोळले,
कितीक देह जाळले.

न्याय नीती आंधळी
शक्ती पांगळी लुळी
किरीट चोर घालतो,
सुळीस साधु चुंबितो.

मनातले कधी जनी
कुणी न पाहि ऐकुनी
एकले कुढायचे,
एकले रडायचे.

कुणास वाहू ही फुले
धरू कुणाची पाऊले
दिसे न देव देऊळी,
जळी स्थळी न कातळी.

जग प्रवास हा बुरा
होय जीव घाबरा
थकोनि अंग टेकले,
अपाप नेत्र झाकले.


कारवान सज्ज

शांत शांत सर्वदूर रात्र देत जांभई 
जागून मी वाचीतसे खय्यामची रुबाई 

दीप मंद ग्रंथ जीर्ण 
वाचन करी मन विषण्ण 
चंद्रमौळी घर माझे फाटकी रजाई 

दूर देश मी फिरलो 
गावोगावी मी रमलो 
विश्रांतीस वृक्ष कधी नि कधी सराई 

जगण्यास्तव धडपडलो 
ठायी ठायी अडखळलो 
रंक पूर्वी रंक आज शून्य मम कमाई 

रमणी भेट क्षण सुवर्ण 
तृप्त नयन मन प्रसन्न 
जीवन ग्रीष्मात स्मृती गार जल सुराई 

पत्नी पुत्र आप्त मित्र 
दृष्टीपुढे पुसट चित्र 
दंग सर्व रंगी स्वीय मीच खिन्न राहीलो 

जीवन भासे लढाई 
हारजीत नित्य होई 
नीतिधर्म केवी कसे पाळी हा शिपाई 

मोही मुळी न ऐलतीर 
दृष्टीपुढे पैलतीर 
कारवान सज्ज कधी कूच झाली घाई.



पावसाळी रात्र

चांदण्यांनी गच्च भरले 
आकाश तू वरती पहा 
पारिजाता बहर आला 
आज तू खाली पहा 

इंद्रधनू हा डोलतो 
तू पहा  फिरूनी पहा 
शुभ्र हा वाहे झरा 
प्रतिबिंब तुझे तू पहा 

या गुलाबी पाकळ्या 
हळुवार तू दुरूनी पहा 
ही पहा आकाशगंगा 
तू इथे जवळी रहा 

हे असे येती कधी 
जीवनी क्षण हे महा 
वेल ही वाको स्मृतींची 
पुस्तीन भरली ही दहा

पावसाची रात्र आहे 
आज तू येथे रहा 
मीलनाची आस आहे 
आज तू येथे रहा .

कै. गोविंदराव झोकरकरांनी वेगवेगळे प्रयोग करत असताना ''सुनीत'' हा प्रकारही हाताळला . त्या अनुषंगे सुनीतबद्दल काही जाणून घेऊ या.

‘सुनीत’ हा इंग्रजीतील ‘सॉनेट‘ ह्या काव्यप्रकाराचा  मराठी अवतार आहे. भावकवितेचा हा प्रकार चौदा ओळींचा एक रचनाबंध असतो.इटालियन वा पीत्रार्क रचनापद्धतीत  ह्या चौदा ओळी आठ व सहा अशा विभागल्या जातात. अष्टकात  दोन चतुष्पद्या व नंतरच्या सहा ओळींत दोन त्रिपद्या असतात. पहिल्या आठ ओळींत एखादी समस्या मांडली जाते, एखादा प्रश्न उपस्थित केला जातो, किंवा कसला तरी भावनिक ताण प्रकट केला जातो. नंतरच्या सहा ओळींत त्या समस्येची सोडवणूक केली जाते, प्रश्नाचे उत्तर दिले जाते वा भावनिक ताण सैल केला जातो. ह्याला कलाटणी म्हणतात.

शेक्सपिअर वा अन्य इंग्रजी पद्घतीच्या सुनीतरचनेत सुनीतामधल्या चौदा ओळींची विभागणी बारा व दोन अशी असते. पहिल्या बारा ओळींत ज्या विचाराचा, भावनेचा वा कल्पनेचा परिपोष करीत आणला असेल, त्याला शेवटच्या दोन ओळींत कलाटणी दिली जाते. सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.

मराठी सुनीतरचनेचा पाया केशवसुतांनी  घातला. त्यांनी चौदा ओळींच्या ह्या रचनाप्रकाराला ‘ चतुर्दशक ‘ असे नाव दिले. ‘मयूरासन आणि ताजमहाल’ हे त्यांचे पहिले स्वतंत्र सुनीत  होय.भा. रा. तांबे यांनीही काही सुनीते लिहिली. गोविंदाग्रज, बालकवी आणि बी ह्या कवींनीही काही सुनीतरचना केल्या. मात्र सुनीताचा विशेष पुरस्कार आणि निर्मिती रविकिरण मंडळातील कवींनी केली. रविकिरण मंडळातील एक प्रमुख कवी माधव जूलियन्  यांची १०१ सुनीते ''त्यांचे तुटलेले दुवे'' या संग्रहात एकत्रित केलेली आहेत. १९४० नंतर सुनीतरचनेचे प्रमाण मराठी काव्यात कमी होत गेले.१९६० च्या सुमारास मराठी नवकवितेत विंदा करंदीकर यांनी मुक्त सुनीते लिहून या काव्यप्रकारात प्रयोगशीलता व नावीन्य आणले. त्यांनी तेरा वा पंधरा ओळींची सुनीतरचना केली. दिलीप चित्रे यांनीही काही मुक्त सुनीते लिहिली आहेत.
(माहिती स्रोत : विकासपीडिया)

हे पुण्य की पाप हे
(सुनीत)

लागे भूक मुलास धान्यकणही नाही घराभीतरी
दुःखी बाप मलूल बंद गिरणी बेकार राही घरी
नाही सर्पण ना दिवा गळतसे कौलार डोक्यावरी
पोरे झोंबती आईला अहह, ती वैतागली अंतरी

येईल रात्र दयामयी निजविण्या निर्धन धनिकाप्रती
आई बाप उपाशी आणि मुलगे आक्रंदूनी झोपती
झाली आणि पहाट बाप उठला आई उठे मागुनी
गेले बाहिर काहीसे उभयही चित्तात संकल्पूनी

पोरे ती उठली उसासती किती पोटी भुकेची कळ
दादा त्यास म्हणे चला मजसवे आणून पायी बळ
गेले मागून बंधूच्या नि शिरले बागेत शेजारच्या
भाज्या आणि फळे खुडून अणिली चोरून माळ्याचिया

कापी बाप खिसे नि द्रव्य मिळवी अनिष्ट की इष्ट हे
चोऱ्या आई करी घरास्तव तशा हे पुण्य की पाप हे.


आत्मनिवेदन
(ही कविता खूप मोठी आहे. त्यातील काही वेचक कडवी इथे देत आहे.)

हासत आलो मी जन्मभर हासत राहीन मी
हासत हासत काळा संगे अंती जाईन मी

पैशाचा मोह नसे मज कीर्तीची हाव
एकच इच्छा प्रेमसागरी पोहो मम नाव

खाण्याची भ्रांती मिळे नच अल्पही विश्रांती
परी आनंदी ठेवूनि वृत्ती वावरतो जगती

आप्त मित्र माझे सकलही साह्यर्थी यांचे
धन्यवाद मानतो ढकलितो संस्कृतीचे ओझे

काव्याच्या प्रांती विहरतो स्मृतींच्या सांगाती
सुंदर सत्य नि शिव तत्वांचा पूजक मी जगती

खोट्याची चेष्टा करीत मी ढोंगाचा द्वेष्टा
आत्मवंचना मुळी रूचेना सीधा मम रस्ता

कलेमध्ये रमतो सदैवही काव्यकृती रचतो
मनोराज्यी परि सदा रंगुनी गुंग धुंद असतो

एकच दृढ श्रद्धा असे मम निसर्ग जगी सत्ता
मानव त्याचे असे खेळणे रंक असो शास्ता!


अजून दिसता गुलाब सुंदर

अजून दिसता गुलाब सुंदर 
हळूच वाटते खुडून घ्यावा 
आणि चेहरा सुरेख दिसता 
अजून वाटते वळून पहावा 

अजून ताजी बालिश वृत्ती 
अजून फुटते ओठी हासू 
अवचित बघुनि कारुण्याला 
अजून येती नयनी आसू 

अजून हिम्मत कष्ट उपसण्या 
कमी न झाली फाके मस्ती 
लक्ष काळज्या जरि कपाळी 
तरीही सुचती गमती जमती 

खिशात नाही एक कपर्दिक 
आणिक साखर उद्या चहाला 
अवीट गोडी हास्य रसाला 
अजून लज्जत श्रृंगाराला 

आजाराची झोंबाझोंबी 
करीत मृत्यूला मुजरे द्यावे 
अजून वाटते मूर्ख मनाला 
खूप जगावे! खूप जगावे!!

संकलन : अलकनंदा साने

    सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव             (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)                   सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...